राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ‘पावनखिंड दिन’ उत्साहात साजरा…

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळा, कासार आंबोली येथे १८ जुलै २०२६ रोजी ‘पावनखिंड दिन’ देशभक्ती, शौर्य आणि इतिहासप्रेमाच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये स्वराज्याचा इतिहास, राष्ट्रभक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा जागविण्याच्या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून व शिवज्योत प्रज्वलित करून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात सकाळी ७ वाजता ‘पावनखिंड दिन’ मोहिमेला प्रारंभ झाला.

शाळेपासून सुमारे साडेआठ किलोमीटर अंतरावरील कासार आंबोली येथील गवळीवाडा परिसरातील भैरवनाथ मंदिरामागील टेकडीपर्यंत विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध पायी संचलन केले. संपूर्ण मार्गात ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

सकाळी साडेनऊच्या सुमारास टेकडीवर पोहोचल्यानंतर शाळेचे सीनियर मास्टर अद्वैत जगधने यांनी पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व, वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची सविस्तर माहिती विद्यार्थिनींना दिली. इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग ऐकताना विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे कमांडंट विंग कमांडर एम. यज्ञरामन आणि प्राचार्या ज्योती खिरीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शाळेचे सैन्य व क्रीडा प्रशिक्षण प्रमुख गजानन माळी तसेच क्रीडा शिक्षक महादेव मगर यांनी उपक्रमाचे नियोजन व यशस्वी अंमलबजावणी केली.

इतिहास, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थित शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वराज्याचा अभिमान आणि राष्ट्रीय मूल्ये अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

Scroll to Top
Skip to content