कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन अतिशय लाभदायक आहेत.
म्हणूनच प्रशालेने इ. 6 वी ते 12 वी सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल संध्याकाळी सात ते आठ या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून, आपल्या पालकांपैकीच इ. 11 वी चे पालक श्री. दिपक चव्हाण यांच्या सहकार्यातून प्रशालेने हे
प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षक श्रीमती वंदना जैन, श्री. करुणानिधी, श्रीमती अबोली हळवे, श्रीमती अनुप्रभा प्रशांथ, यांनी योगासने, भस्त्रिका, भ्रामरी सारखे प्राणायाम, विविध खेळांच्या माध्यमातून स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे व्यायाम सांगितले. हसतखेळत दिलेल्या प्रशिक्षणाला तिनही दिवस विद्यार्थिनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणाला प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे पदाधिकारी व सर्व स्टाफ या प्रसंगी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ. सावित्री पाटील आणि श्री. प्रमोद झुरमुरे यांनी केले.

   

   

   

   

प्रतिवर्षीप्रमाणे दि. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – अटल समिती, शिक्षण प्रबोधिनी व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने Science February हा उपक्रम संपूर्ण महिन्यात राबविण्यात आला.त्याअंतर्गत विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांवर आधारित Hands on activities यावर आधारित अध्यापक कार्यशाळा व्याख्यानमालेचे आयोजन सर्व शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी करण्यात आले. या कार्यशाळा दि. ७, १४, २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन संपन्न झाल्या. दि. ७ रोजी अगस्त्य फाउंडेशन, दि. १४ रोजी आयुका व कार्यक्रम रोजी आयसर पुणेच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या सर्व कार्यशाळांचे नियोजन आपल्या प्रशालेतर्फे विज्ञान विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील यांनी प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते व उपप्राचार्य मा. श्री. अनंत कुलकर्णी व शालेय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केले. इ. ६ वी ते १२ वी च्या सर्व विज्ञान अध्यापकांनी उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
दि. २८ रोजी या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. जयंत सहस्रबुद्धे यांनी Future of Science & technology in Education या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष मा.श्री.अभयजी क्षीरसागर, सहसचिव गाडे सर, शिक्षण प्रबोधिनी अध्यक्षा मा. आनंदी पाटील, संचालक मा. श्री. संतोष देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. डॉ. सुलभा विधाते यांनी केला.
संपूर्ण उपक्रम नियोजन, तांत्रिक सहकार्य यासाठी शिक्षण प्रबोधिनी उपसंचालक मा. श्री. केदार तापीकर व वर्षा न्यायाधीश madam यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाचा भाग म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इ.६ वी – विज्ञान कोडे स्पर्धा
इ.७ वी – भारतीय शास्त्रज्ञ माहिती संकलन
इ.८ वी – विज्ञान कोपरा – तक्ते, चित्रे, मॉडेल, कात्रणे इ.
इ.९ वी – आयुका पुणे आयोजित, कविता व पोस्टर स्पर्धा सहभाग, प्रश्नमंजूषा स्पर्धा
इ.११ वी – विज्ञान दिन परिपाठ कार्यक्रम नियोजन व सहभाग – १ मार्च रोजी
तसेच जून ते फेब्रुवारी ऑनलाईन कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा , व्याख्याने यासारख्या २६ विविध उपक्रमात आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.

शनिवार, दिनांक :  २७ फेब्रुवारी २०२१ रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी “रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या” वतीने स्मार्ट बोर्डचे हस्तांतरण करण्यात आले. रोटरी मेट्रो क्लब पुणे यांनी शाळेला दोन आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट बोर्ड दिले. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानदानाचे कार्य अधिक आधुनिक, सुसंगत व तंत्र स्नेही होईल अशी आशा आहे. या कार्यक्रमासाठी पुणे मेट्रो चे अध्यक्ष श्री. मकरंद फडके तसेच समन्वयक श्री. गिरीश जी रानडे व कार्यक्रमासाठी शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर माधवीताई मेहेंदळे या उपस्थित होत्या. प्रशालेच्या प्राचार्या डॉक्टर सुलभा विधाते यांनी रोटरी कडून हा स्मार्ट बोर्ड स्वीकारला या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार तसेच पुणे मेट्रो रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

 

बुधवार, दिनांक : १७ मार्च २०२१ रोजी सैनिकी शाळेत Air Wing N.C.C.Flag Ceremony सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी Group Captain R. S. Jadhav F (P) Commanding officer 3 MAH. Air Squadran NCC Pune, MWO (HFO) S. M. Labade ( Affiit) व त्यांचे सहकारी अधिकारी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक, तसेच कॅडेट कु. जान्हवी बर्वे , कु. सुरभी पाठक, कु. आर्या चोरघे  उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्याकडे N.C.C ध्वज प्रदान करण्यात आला.

सकाळ वर्तमानपत्रात -” करियर ‘ती’ चे ” या सदरात प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सुलभा नितीन विधाते यांची लेखमाला …...

दि. ६ जानेवारी २०२१ 

दि. १३  जानेवारी २०२१ 

दि. २० जानेवारी २०२१ 

दि. १७ मार्च २०२१

महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य वेबिनार

“Score more in Maths, Science” 2020-21 दहावी विद्यार्थ्यांसाठी.

 

गणित व शास्त्र विषयांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तक तज्ञांचा विशेष वेबिनार .
  •  प्रत्येक लेसन ची संकल्पना व आकलनाची तयारी
  • गुण मिळवण्याचे तंत्र व टिप्स
  • प्रश्न आकलन ,अचुक उत्तरे बद्दल मार्गदर्शन
  • कमी केलेला अभ्यासक्रम?
  • सध्याचा काळ सरावासाठी कसा उत्तम?
मार्गदर्शक :
आपल्या प्रशालेतील मुख्याध्यापिका  – डॉ सुलभा विधाते – विज्ञान ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )
                                                           डॉ जयश्री अत्रे – गणित ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )

 

आयोजक  :
प्रा. मेधा कुलकर्णी ( माजी आमदार ) व सुपरमाईन्ड स्टडी
रविवार, दि 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता. झूमवर त्वरित नोंदणी करा…….
https://rb.gy/bhnuim

 

वरील मेसेज दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यंत फॉरवर्ड करा
Meeting Id and password will send you soon.
Contact: 9049992808 / 9923798172

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – शतकोत्तर हीरकमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार अंबोली, पुणे.

गुरूवार , दिनांक : १९ नोव्हेंबर २०२०, सकाळी ९ वाजता

स्थळ : गोडबोले सभागृह, रा. ल. मु. सै. शा.

 

महाराष्ट्र  एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षपूर्ती प्रित्यर्थ प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी पुणे मनपा कसबा मतदारसंघातील विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिती माजी अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके (सूर्यवंशी) तसेच कराटे ची आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विश्वविक्रम केलेली खेळाडू कु. वैष्णवी दादाराम  मांडेकर उपस्थित होत्या.

 

 कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :
  • दीपप्रज्ज्वलन व सरस्वतीस्तवन
  • सरस्वती व संस्थापक प्रतिमा पूजन
  • प्रास्ताविक
  • प्रमुख अतिथी परिचय व सत्कार
  • म.ए.सो.गीत व लघुपट
  • अतिथी मनोगत
  • आभार प्रदर्शन
  • पसायदान

 

  • कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथी यांच्या हस्ते व प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  दीपप्रज्ज्वलन तसेच सरस्वती पूजन व म. ए. सो. चे संस्थापक मा. वामन प्रभाकर भावे, मा. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, व मा. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी संस्था स्थापनेमागील पार्श्वभूमी विशद केली .
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सुलभा नितीन विधाते यांनी केले. प्रास्ताविकात मा. प्राचार्यानी इंग्रज राजवटीच्या कठीण काळात संस्था स्थापनेमागील हेतु व उद्देश सांगितला व संस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी व मा. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचा देखील थोडक्यात आढावा सांगितला. संस्थेच्या भविष्य कालीन Mission statement व त्यामागील आपल्या प्रशालेची भूमिका देखील स्पष्ट केली.
  • प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी उपस्थित अतिथींचा यथोचित परिचय करून दिला तसेच याप्रसंगी विद्यार्थिनींच्या शालेय जीवनातील अनेक प्रसंग व आठवणींना उजाळा दिला. मा. प्राचार्यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन करण्यात आले. तसेच प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांचे हस्ते अतिथींच्या कुटुंबियांचे स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांनी अतिथींना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • म. ए. सो. च्या ज्ञानवृक्षाचा विस्तार व आजपर्यंतचा यशस्वी प्रवास चित्रफिती द्वारे अतिथींना उलगडून दाखवण्यात आला.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू कु. वैष्णवी मांडेकर हिने मनोगत व्यक्त केले. आपल्या क्रीड़ाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शाळेतील प्रत्येक घटकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे अशी भावना वैष्णवीने व्यक्त केली तसेच संस्था, प्रशाला, शिक्षक व सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या शुभप्रसंगी तसेच आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ वैष्णवीने प्रशालेस १०० रोपे भेटस्वरूपात दिली सर्व मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिति अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके हिने देखील मनोगत व्यक्त केले. सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन शाळेमध्येच खऱ्या अर्थाने माझी जडणघडण झाली व या सर्वांगीण विकासामध्ये सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे आवर्जुन नमूद केले .
  • कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व अतिथींविषयी कृतज्ञता प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. संस्थेच्या पुढील यशस्वी मार्गक्रमणासाठी आपल्या प्रशालेचे योगदान व त्यासाठी आपली भूमिका सरांनी मनोगतातून मांडली.
  • कार्यक्रमाचा समारोप प्रशालेतील शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी गायलेल्या पसायदानाद्वारे करण्यात आला .
  • दि. १९ नोव्हेंबर या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे थोर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची जयंती. यानिमित्त प्रशालेतील परिसरात स्थापित असलेल्या राणीच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  • सैनिकी परिवारातील उपस्थित पदाधिकारी, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर सहकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सैनिकी परिवारातील सर्व सदस्यांनी योगदान दिले.

                  

               

         

   

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ( सन १८६०- २०२०) मा. श्री. नितीन गडकरी जी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म – लघु – मध्यम उद्योग मंत्री यांचे आज मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी आँनलाईन व्याख्यान झाले या कार्यक्रमासाठी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या गोडबोले सभागृहात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, एकूण  २१ उपस्थिती होती. तर मा. प्राचार्यांच्या पूर्वपरवानगीने बाहेरगावी असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आँनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला, या  निमित्ताने मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया – केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही – मा. नितीन गडकरी
“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.
लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
     

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही आहे. कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश प्रशालेचे सर्व कर्मचारीवर्ग, पालक व विद्यार्थिनींनी जनतेला दिला.

“घरी रहा, सुरक्षित रहा व रोज सूर्यनमस्कार  करून सुदृढ रहा” इयत्ता नववी अ कोरोना विषाणू सोबत  सामना करत असताना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सूर्यनमस्कार करण्याचा संदेश देत आहेत इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व वर्गशिक्षक श्री. प्रशांत जोशी सर.

               

स्वतः बनवलेले मास्क वापरताना इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व पालक

लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थिनी व शिक्षक त्यांच्या घराच्या परिसरात रोज चिमण्यांना पाणी व अन्न ठेवतात.

 

 

सैन्य प्रशिक्षण देणारी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही देते. याच सामाजिक जाणिवेचे दर्शन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थिनींनी सैन्य गणवेशात कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश जनतेला दिला. अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विद्यार्थिनींचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

 

 

“बस हस्तांतरण सोहळा “

दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशाले साठी मा.सतीश कुलकर्णी (दानशूर व्यक्तिमत्व ) व कुटुंबीय मा.मुकूंद कुलकर्णी मा.श्रीरंग कुलकर्णी मा.सौ सविता कुलकर्णी मा. सौ माधुरी कुलकर्णी यांनी पन्नास आसनक्षमता असलेली ‘बस’ प्रशालेसाठी दिली. सैनिकी शाळा निवासी असल्याने शाळेला बसची नितांत गरज होती. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.प्रदीपजी नाईक, म.ए.सो नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा.बाबासाहेब शिंदे, शाला समिती महामात्र डॉ.मानसी भाटे, म.ए.सो.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिन आंबर्डेकर, संस्थेचे सहसचिव मा.सुधीर गाडे, अभिनेते रवींद्र खरे हे उपस्थित होते.

 

 

झाँसी अभ्यास दौरा  दिनांक 16 जानेवारी 2020 ते 21 जानेवारी 2020 यादरम्यान झाॅंसी अभ्यासदौरा आयोजित केला होता. प्रशालेतील 10 कॅडेट्स व तीन शिक्षक हे राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र अभ्यासण्यासाठी झाँसी या ठिकाणी गेले होते. झाँसी येथे या टीमने झाँसी फोर्ट, राणी महल, ओरचा, राम राजा मंदिर या स्थळांचा अभ्यास केला. ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे यांची माहिती घेतली. झाँसी संग्रहालय येथे भेट दिली. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील आधारित “क्या खूब लडी मर्दानी,वो तो  झाँसीवाली रानी थी| ” ही   कविता झाँसी किल्ल्यावर लोकांसमोर सादर केली. सदर टीमचा निवास ३१आर्मड डिव्हीजन झाँसी येथे होता. दौर्‍यात विविध प्रकारचे टॅंक, गन यांचा अभ्यास केला. टँक वर बसून ऐतिहासिक सफरचा अनुभवही या टीमने घेतला. अनेक सैन्य अधिकारी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा दौरा यशस्वी करण्यासाठी मा.सतीश कुलकर्णी ( मुख्य प्रायोजक ),म.ए.सो.संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी सहस्त्रबुद्धे,प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे,शाला समिती सदस्य व प्रशालेने विशेष मेहनत घेतली होती.

 

 

 

 

 

स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशालेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार आंबोली गावचे उपसरपंच मा.सचिन धुमाळ हे होते. याप्रसंगी इयत्ता आठवीतील मुलींनी स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील प्रसंग सादर केले. स्वा.सावरकर लिखित ‘ जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे ‘हे काव्य गायले. स्वा. सावरकर लिखित कविता म्हटल्या. श्रीमती मालतीताई आठवले यांच्या तर्फे स्वा.सावरकर पुण्यतिथी ला इयत्ता आठवीतून प्रथम व द्वितीय क्रमांकांना रोख रक्कम रुपये 1000/- प्रत्येकी व सावरकर ग्रंथ भेट दिले जातात. ते पुरस्कार यावर्षी प्रथम क्रमांक  कु.आश्विनी धुमाळ व द्वितीय क्रमांक कु.ईश्वरी लेकुरवाळे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाने तयारी करून घेतली होती.

 

 

 

 

 

 

प्रतिवर्षीप्रमाणे प्रशालेत   दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या  दिमाखात पार पडला. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना याप्रसंगी शिवप्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढली. याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी पोवाडा गायन,शिवचरित्रातील स्फूर्तिदायक प्रसंग कथन करणे, शिवरायांवरील काव्ये गायन करणे,कथाकथन इ. कार्यक्रम सादर केले.शिवचरित्रावरील उत्तम देखावा हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. उत्तम रंगावली,  फलक लेखन व भगव्या फेट्यांसह विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. इयत्ता नववीचे दोन्ही वर्गशिक्षक व इतिहास विभागाच्या मदतीने हा सोहळा उत्साहवर्धक ठरला.

 

 

 

 

 

 

 

        यावर्षी स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्वच्छ – स्वयंभू’ भारत असा होता. सर्व विद्यार्थिनींना संधी मिळावी व पालकांना देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने स्नेहसंमेलन दोन भागात झाले. इ.५ वी ते इ.८ वी चे दिनांक २३ डिसेंबर व इ.९ वी ते इ. १२ वी चे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी १० ते  या वेळेत शालेय सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी अनुक्रमे मा. भाग्यश्री न्हालवे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) आणि मा. सुरभी भावे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) या लाभल्या होत्या.

 

भाग 1 – इ.५ वी ते इ.८ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वच्छता’ होता. या कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनेने स्वच्छतेचा विविध गीतांवर नृत्य, गाडगे महाराजांवर किर्तन, मन की स्वच्छता हे हिंदी व ग्रामस्वच्छतेशी संबंधित स्वच्छतेचा जागर हे मराठी नाटक यांचा समावेश होता. प्लास्टिक मुक्ती संदर्भातील गीत देखील सादर करण्यात आले. विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. तनया रानवडे व कु. पायल जासुद यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात गुणवंत विद्यार्थिनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. वर्गश: इ.५ वी ते इ.८ वी उत्कृष्ट विद्यार्थिनी आणि देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्री साईनाथ जगदाळे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या भाग्यश्री न्हालवे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
    संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन कार्यवाह सौ सावित्री पाटील व सूत्रसंचालन उपकार्यवाह महेश कोतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे  आणि उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी मानले.

भाग 2 – इ.९ वी ते इ. १२ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वयंभू’ भारत असा होता. सुरुवातीला नटराज पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या मा. सुरभी भावे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रशालेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनेने झाली. देशातील चालू घडामोडींची माहिती व्हावी व आपला देश स्वयंभू बनवण्याकडे वाटचाल करत आहे याची जाणीव व्हावी म्हणून उरी हल्ला, काश्मीरचे 370 कलम, खेळातून देशभक्ती, देशभक्तीपर गीतांवर नृत्य – देखावे यातून मांडण्यात आले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण नाटकाच्या स्वरूपात सादर केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक आद्य – क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनप्रसंगावर आधारित नाटिका सादर केली. इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी मातृभूमीच्या मानवाकडून असलेल्या अपेक्षा पत्र रूपात मांडणी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. मृणाल कदम व कु. श्रुती डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात पारितोषिक वितरण झाले त्याचे सूत्रसंचालन श्री. महेश कोतकर यांनी केले. इ.९ वी ते इ. १२ वी वर्गश: उत्कृष्ट विद्यार्थिनी व देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. डॉ. म. वि. गोखले फिरता चषक इ.१० वी ची उत्कृष्ट कु. अनुष्काराजे निंबाळकर आणि डॉ. कॅप्टन सि. म. चितळे फिरता चषक इ.१२ वी ची उत्कृष्ट विद्यार्थिनी कु. संस्कृती जाधव यांना डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कार्यालयीन लिपिक श्री.मारणे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले तसेच सूत्रसंचालन कार्यवाह सौ. सावित्री पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत उपप्राचार्य श्री अनंत कुलकर्णी आणि उपस्थितांचे आभार श्री. अद्वैत जगधने यांनी मानले.

       दोन्ही प्रमुख पाहुण्या माजी विद्यार्थिनी मा. भाग्यश्री न्हालवे व मा. सुरभी भावे यांनी मार्गदर्शन पर मनोगतात प्रशालेतील अनुभव कथन केले. या शाळेने “स्वाभिमान, निर्भीडपणे जगाला तोंड दयायची वृत्ती, पेशन्स, सामाजिक भान, चूक सुद्धा स्वीकारण्याची वृत्ती, मानसिक आत्मबळ अशी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल इतकी शिदोरी दिली आहे. उत्तम शिक्षक, शिक्षण, प्रेम, आपुलकी, घरासारखी हक्काची जागा या मोठया जगात दिली.” तसेच सैनिकी शाळेत मिळणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणाचा वक्तशीरपणा, संयम, शिस्त यांचा आपल्या पुढील आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे येथील प्रत्येक मुलीने, प्रत्येक गोष्ट मनापासून करावी शिक्षक – प्रशिक्षक यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन मुलींना केले.
    याप्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थीनीनचे मार्गदर्शनपर भाषणात कौतुक केले.
     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, स्नेहसंमेलन समिती ( सौ. सावित्री पाटील, श्री. कोतकर, श्री. जगधने, सौ. मारणे, श्री. जगदाळे,
सौ. वैशाली शिंदे, सौ. सोळंके, सौ. सुषमा पाटील ), पारितोषिक वितरण समिती (श्री. कोतकर, सौ. मारणे, श्री. जगदाळे, सौ. आंग्रे ) यांनी विशेष योगदान दिले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर ,माऊली, मेस विभाग, अश्वशाळा ते पाकशाळा सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

 

Scroll to Top
Skip to content