पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आह.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

 

संवाद विरांगने सोबत – भाग तिसरा – स्कॉ. लीडर वैष्णवी टोकेकर, प्रशालेची माजी विद्यार्थिनी. इंडियन एअर फोर्स मध्ये सेवा बजावत असलेल्या स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर हिची ऑनलाईन मुलाखत प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी व पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. यशाचे उंच शिखर एखादी विद्यार्थीनी कसे गाठू शकते हे अनुभवणे म्हणजे स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी सोबत झालेला संवाद होय. सैन्य दलात जाण्यासाठी आवश्यक तयारी कशी करावी तसेच तेथील कामाचे स्वरूप व महिलांना खुली झालेली अनेक दालने हे आपण तिच्याशी झालेल्या संवादातून अनुभवू शकतो.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन अतिशय लाभदायक आहेत.
म्हणूनच प्रशालेने इ. 6 वी ते 12 वी सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल संध्याकाळी सात ते आठ या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून, आपल्या पालकांपैकीच इ. 11 वी चे पालक श्री. दिपक चव्हाण यांच्या सहकार्यातून प्रशालेने हे
प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षक श्रीमती वंदना जैन, श्री. करुणानिधी, श्रीमती अबोली हळवे, श्रीमती अनुप्रभा प्रशांथ, यांनी योगासने, भस्त्रिका, भ्रामरी सारखे प्राणायाम, विविध खेळांच्या माध्यमातून स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे व्यायाम सांगितले. हसतखेळत दिलेल्या प्रशिक्षणाला तिनही दिवस विद्यार्थिनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणाला प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे पदाधिकारी व सर्व स्टाफ या प्रसंगी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ. सावित्री पाटील आणि श्री. प्रमोद झुरमुरे यांनी केले.

   

   

   

   

प्रतिवर्षीप्रमाणे दि. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – अटल समिती, शिक्षण प्रबोधिनी व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने Science February हा उपक्रम संपूर्ण महिन्यात राबविण्यात आला.त्याअंतर्गत विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांवर आधारित Hands on activities यावर आधारित अध्यापक कार्यशाळा व्याख्यानमालेचे आयोजन सर्व शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी करण्यात आले. या कार्यशाळा दि. ७, १४, २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन संपन्न झाल्या. दि. ७ रोजी अगस्त्य फाउंडेशन, दि. १४ रोजी आयुका व कार्यक्रम रोजी आयसर पुणेच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या सर्व कार्यशाळांचे नियोजन आपल्या प्रशालेतर्फे विज्ञान विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील यांनी प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते व उपप्राचार्य मा. श्री. अनंत कुलकर्णी व शालेय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केले. इ. ६ वी ते १२ वी च्या सर्व विज्ञान अध्यापकांनी उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
दि. २८ रोजी या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. जयंत सहस्रबुद्धे यांनी Future of Science & technology in Education या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष मा.श्री.अभयजी क्षीरसागर, सहसचिव गाडे सर, शिक्षण प्रबोधिनी अध्यक्षा मा. आनंदी पाटील, संचालक मा. श्री. संतोष देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. डॉ. सुलभा विधाते यांनी केला.
संपूर्ण उपक्रम नियोजन, तांत्रिक सहकार्य यासाठी शिक्षण प्रबोधिनी उपसंचालक मा. श्री. केदार तापीकर व वर्षा न्यायाधीश madam यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाचा भाग म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इ.६ वी – विज्ञान कोडे स्पर्धा
इ.७ वी – भारतीय शास्त्रज्ञ माहिती संकलन
इ.८ वी – विज्ञान कोपरा – तक्ते, चित्रे, मॉडेल, कात्रणे इ.
इ.९ वी – आयुका पुणे आयोजित, कविता व पोस्टर स्पर्धा सहभाग, प्रश्नमंजूषा स्पर्धा
इ.११ वी – विज्ञान दिन परिपाठ कार्यक्रम नियोजन व सहभाग – १ मार्च रोजी
तसेच जून ते फेब्रुवारी ऑनलाईन कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा , व्याख्याने यासारख्या २६ विविध उपक्रमात आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.

शनिवार, दिनांक :  २७ फेब्रुवारी २०२१ रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी “रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या” वतीने स्मार्ट बोर्डचे हस्तांतरण करण्यात आले. रोटरी मेट्रो क्लब पुणे यांनी शाळेला दोन आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट बोर्ड दिले. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानदानाचे कार्य अधिक आधुनिक, सुसंगत व तंत्र स्नेही होईल अशी आशा आहे. या कार्यक्रमासाठी पुणे मेट्रो चे अध्यक्ष श्री. मकरंद फडके तसेच समन्वयक श्री. गिरीश जी रानडे व कार्यक्रमासाठी शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर माधवीताई मेहेंदळे या उपस्थित होत्या. प्रशालेच्या प्राचार्या डॉक्टर सुलभा विधाते यांनी रोटरी कडून हा स्मार्ट बोर्ड स्वीकारला या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार तसेच पुणे मेट्रो रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

 

बुधवार, दिनांक : १७ मार्च २०२१ रोजी सैनिकी शाळेत Air Wing N.C.C.Flag Ceremony सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी Group Captain R. S. Jadhav F (P) Commanding officer 3 MAH. Air Squadran NCC Pune, MWO (HFO) S. M. Labade ( Affiit) व त्यांचे सहकारी अधिकारी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक, तसेच कॅडेट कु. जान्हवी बर्वे , कु. सुरभी पाठक, कु. आर्या चोरघे  उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्याकडे N.C.C ध्वज प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य वेबिनार

“Score more in Maths, Science” 2020-21 दहावी विद्यार्थ्यांसाठी.

 

गणित व शास्त्र विषयांमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तक तज्ञांचा विशेष वेबिनार .
  •  प्रत्येक लेसन ची संकल्पना व आकलनाची तयारी
  • गुण मिळवण्याचे तंत्र व टिप्स
  • प्रश्न आकलन ,अचुक उत्तरे बद्दल मार्गदर्शन
  • कमी केलेला अभ्यासक्रम?
  • सध्याचा काळ सरावासाठी कसा उत्तम?
मार्गदर्शक :
आपल्या प्रशालेतील मुख्याध्यापिका  – डॉ सुलभा विधाते – विज्ञान ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )
                                                           डॉ जयश्री अत्रे – गणित ( पाठ्यपुस्तक मंडळ सदस्य, SSC बोर्ड महाराष्ट्र )

 

आयोजक  :
प्रा. मेधा कुलकर्णी ( माजी आमदार ) व सुपरमाईन्ड स्टडी
रविवार, दि 29 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता. झूमवर त्वरित नोंदणी करा…….
https://rb.gy/bhnuim

 

वरील मेसेज दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यंत फॉरवर्ड करा
Meeting Id and password will send you soon.
Contact: 9049992808 / 9923798172

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – शतकोत्तर हीरकमहोत्सव वर्षपूर्ती समारंभ

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार अंबोली, पुणे.

गुरूवार , दिनांक : १९ नोव्हेंबर २०२०, सकाळी ९ वाजता

स्थळ : गोडबोले सभागृह, रा. ल. मु. सै. शा.

 

महाराष्ट्र  एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षपूर्ती प्रित्यर्थ प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी पुणे मनपा कसबा मतदारसंघातील विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिती माजी अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके (सूर्यवंशी) तसेच कराटे ची आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध विश्वविक्रम केलेली खेळाडू कु. वैष्णवी दादाराम  मांडेकर उपस्थित होत्या.

 

 कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते :
  • दीपप्रज्ज्वलन व सरस्वतीस्तवन
  • सरस्वती व संस्थापक प्रतिमा पूजन
  • प्रास्ताविक
  • प्रमुख अतिथी परिचय व सत्कार
  • म.ए.सो.गीत व लघुपट
  • अतिथी मनोगत
  • आभार प्रदर्शन
  • पसायदान

 

  • कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अतिथी यांच्या हस्ते व प्रशालेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत  दीपप्रज्ज्वलन तसेच सरस्वती पूजन व म. ए. सो. चे संस्थापक मा. वामन प्रभाकर भावे, मा. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, व मा. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी संस्था स्थापनेमागील पार्श्वभूमी विशद केली .
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सुलभा नितीन विधाते यांनी केले. प्रास्ताविकात मा. प्राचार्यानी इंग्रज राजवटीच्या कठीण काळात संस्था स्थापनेमागील हेतु व उद्देश सांगितला व संस्थापकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.तसेच दि. १७ व १८ नोव्हेंबर २०२० रोजी संपन्न झालेल्या केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी व मा. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचा देखील थोडक्यात आढावा सांगितला. संस्थेच्या भविष्य कालीन Mission statement व त्यामागील आपल्या प्रशालेची भूमिका देखील स्पष्ट केली.
  • प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार यांनी उपस्थित अतिथींचा यथोचित परिचय करून दिला तसेच याप्रसंगी विद्यार्थिनींच्या शालेय जीवनातील अनेक प्रसंग व आठवणींना उजाळा दिला. मा. प्राचार्यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ व भेटकार्ड देऊन करण्यात आले. तसेच प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांचे हस्ते अतिथींच्या कुटुंबियांचे स्वागत करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांनी अतिथींना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • म. ए. सो. च्या ज्ञानवृक्षाचा विस्तार व आजपर्यंतचा यशस्वी प्रवास चित्रफिती द्वारे अतिथींना उलगडून दाखवण्यात आला.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू कु. वैष्णवी मांडेकर हिने मनोगत व्यक्त केले. आपल्या क्रीड़ाक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शाळेतील प्रत्येक घटकाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे अशी भावना वैष्णवीने व्यक्त केली तसेच संस्था, प्रशाला, शिक्षक व सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या शुभप्रसंगी तसेच आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ वैष्णवीने प्रशालेस १०० रोपे भेटस्वरूपात दिली सर्व मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण केले.
  • कार्यक्रमाची प्रमुख अतिथी विद्यमान नगरसेविका व पुणे म. न. पा. विधी समिति अध्यक्षा अॅड. गायत्री रत्नदीप खडके हिने देखील मनोगत व्यक्त केले. सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देऊन शाळेमध्येच खऱ्या अर्थाने माझी जडणघडण झाली व या सर्वांगीण विकासामध्ये सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे आवर्जुन नमूद केले .
  • कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व अतिथींविषयी कृतज्ञता प्रशालेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन ( निवृत्त ) विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. संस्थेच्या पुढील यशस्वी मार्गक्रमणासाठी आपल्या प्रशालेचे योगदान व त्यासाठी आपली भूमिका सरांनी मनोगतातून मांडली.
  • कार्यक्रमाचा समारोप प्रशालेतील शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी गायलेल्या पसायदानाद्वारे करण्यात आला .
  • दि. १९ नोव्हेंबर या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे थोर वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांची जयंती. यानिमित्त प्रशालेतील परिसरात स्थापित असलेल्या राणीच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
  • सैनिकी परिवारातील उपस्थित पदाधिकारी, शिक्षकवृंद ,शिक्षकेतर सहकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सैनिकी परिवारातील सर्व सदस्यांनी योगदान दिले.

                  

               

         

   

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ( सन १८६०- २०२०) मा. श्री. नितीन गडकरी जी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म – लघु – मध्यम उद्योग मंत्री यांचे आज मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी आँनलाईन व्याख्यान झाले या कार्यक्रमासाठी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या गोडबोले सभागृहात शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, एकूण  २१ उपस्थिती होती. तर मा. प्राचार्यांच्या पूर्वपरवानगीने बाहेरगावी असणाऱ्या शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आँनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला, या  निमित्ताने मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

नवे शैक्षणिक धोरण हा आत्मनिर्भर भारताचा पाया – केंद्रीय शिक्षण मंत्री पोखरियाल

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

‘मएसो’चे योगदान देश कधीही विसरू शकणार नाही – मा. नितीन गडकरी
“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.
मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.
लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
     

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही आहे. कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश प्रशालेचे सर्व कर्मचारीवर्ग, पालक व विद्यार्थिनींनी जनतेला दिला.

“घरी रहा, सुरक्षित रहा व रोज सूर्यनमस्कार  करून सुदृढ रहा” इयत्ता नववी अ कोरोना विषाणू सोबत  सामना करत असताना रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सूर्यनमस्कार करण्याचा संदेश देत आहेत इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व वर्गशिक्षक श्री. प्रशांत जोशी सर.

               

स्वतः बनवलेले मास्क वापरताना इयत्ता नववी अ च्या विद्यार्थिनी व पालक

लॉक डाऊन च्या काळात विद्यार्थिनी व शिक्षक त्यांच्या घराच्या परिसरात रोज चिमण्यांना पाणी व अन्न ठेवतात.

 

 

“बस हस्तांतरण सोहळा “

दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशाले साठी मा.सतीश कुलकर्णी (दानशूर व्यक्तिमत्व ) व कुटुंबीय मा.मुकूंद कुलकर्णी मा.श्रीरंग कुलकर्णी मा.सौ सविता कुलकर्णी मा. सौ माधुरी कुलकर्णी यांनी पन्नास आसनक्षमता असलेली ‘बस’ प्रशालेसाठी दिली. सैनिकी शाळा निवासी असल्याने शाळेला बसची नितांत गरज होती. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.प्रदीपजी नाईक, म.ए.सो नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा.बाबासाहेब शिंदे, शाला समिती महामात्र डॉ.मानसी भाटे, म.ए.सो.संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.सचिन आंबर्डेकर, संस्थेचे सहसचिव मा.सुधीर गाडे, अभिनेते रवींद्र खरे हे उपस्थित होते.

 

 

झाँसी अभ्यास दौरा  दिनांक 16 जानेवारी 2020 ते 21 जानेवारी 2020 यादरम्यान झाॅंसी अभ्यासदौरा आयोजित केला होता. प्रशालेतील 10 कॅडेट्स व तीन शिक्षक हे राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र अभ्यासण्यासाठी झाँसी या ठिकाणी गेले होते. झाँसी येथे या टीमने झाँसी फोर्ट, राणी महल, ओरचा, राम राजा मंदिर या स्थळांचा अभ्यास केला. ऐतिहासिक वास्तू,ठिकाणे यांची माहिती घेतली. झाँसी संग्रहालय येथे भेट दिली. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील आधारित “क्या खूब लडी मर्दानी,वो तो  झाँसीवाली रानी थी| ” ही   कविता झाँसी किल्ल्यावर लोकांसमोर सादर केली. सदर टीमचा निवास ३१आर्मड डिव्हीजन झाँसी येथे होता. दौर्‍यात विविध प्रकारचे टॅंक, गन यांचा अभ्यास केला. टँक वर बसून ऐतिहासिक सफरचा अनुभवही या टीमने घेतला. अनेक सैन्य अधिकारी विशेषत: महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा दौरा यशस्वी करण्यासाठी मा.सतीश कुलकर्णी ( मुख्य प्रायोजक ),म.ए.सो.संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीवजी सहस्त्रबुद्धे,प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे,शाला समिती सदस्य व प्रशालेने विशेष मेहनत घेतली होती.

 

 

 

 

 

स्वा.विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी प्रशालेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार आंबोली गावचे उपसरपंच मा.सचिन धुमाळ हे होते. याप्रसंगी इयत्ता आठवीतील मुलींनी स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील प्रसंग सादर केले. स्वा.सावरकर लिखित ‘ जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे ‘हे काव्य गायले. स्वा. सावरकर लिखित कविता म्हटल्या. श्रीमती मालतीताई आठवले यांच्या तर्फे स्वा.सावरकर पुण्यतिथी ला इयत्ता आठवीतून प्रथम व द्वितीय क्रमांकांना रोख रक्कम रुपये 1000/- प्रत्येकी व सावरकर ग्रंथ भेट दिले जातात. ते पुरस्कार यावर्षी प्रथम क्रमांक  कु.आश्विनी धुमाळ व द्वितीय क्रमांक कु.ईश्वरी लेकुरवाळे यांना प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी इतिहास विभागाने तयारी करून घेतली होती.

 

 

 

 

 

 

प्रतिवर्षीप्रमाणे प्रशालेत   दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी मोठ्या  दिमाखात पार पडला. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना याप्रसंगी शिवप्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढली. याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी पोवाडा गायन,शिवचरित्रातील स्फूर्तिदायक प्रसंग कथन करणे, शिवरायांवरील काव्ये गायन करणे,कथाकथन इ. कार्यक्रम सादर केले.शिवचरित्रावरील उत्तम देखावा हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. उत्तम रंगावली,  फलक लेखन व भगव्या फेट्यांसह विद्यार्थिनींनी केलेली वेशभूषा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. इयत्ता नववीचे दोन्ही वर्गशिक्षक व इतिहास विभागाच्या मदतीने हा सोहळा उत्साहवर्धक ठरला.

 

 

 

 

 

 

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, पुणे येथील विद्यार्थिनींनी व सर्व कर्मचारी यांनी कोरोना वैश्विक महामारी विरुद्ध लढण्यासाठी जनतेला दिलेला संदेश.

        यावर्षी स्नेहसंमेलनाचा विषय ‘स्वच्छ – स्वयंभू’ भारत असा होता. सर्व विद्यार्थिनींना संधी मिळावी व पालकांना देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने स्नेहसंमेलन दोन भागात झाले. इ.५ वी ते इ.८ वी चे दिनांक २३ डिसेंबर व इ.९ वी ते इ. १२ वी चे दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी १० ते  या वेळेत शालेय सभागृहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी अनुक्रमे मा. भाग्यश्री न्हालवे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) आणि मा. सुरभी भावे (अभिनेत्री मालिका व सिनेसृष्टी) या लाभल्या होत्या.

 

भाग 1 – इ.५ वी ते इ.८ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वच्छता’ होता. या कार्यक्रमाची सुरूवात गणेशवंदनेने स्वच्छतेचा विविध गीतांवर नृत्य, गाडगे महाराजांवर किर्तन, मन की स्वच्छता हे हिंदी व ग्रामस्वच्छतेशी संबंधित स्वच्छतेचा जागर हे मराठी नाटक यांचा समावेश होता. प्लास्टिक मुक्ती संदर्भातील गीत देखील सादर करण्यात आले. विविधगुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. तनया रानवडे व कु. पायल जासुद यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात गुणवंत विद्यार्थिनी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. वर्गश: इ.५ वी ते इ.८ वी उत्कृष्ट विद्यार्थिनी आणि देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन श्री साईनाथ जगदाळे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या भाग्यश्री न्हालवे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
    संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन कार्यवाह सौ सावित्री पाटील व सूत्रसंचालन उपकार्यवाह महेश कोतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे  आणि उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी मानले.

भाग 2 – इ.९ वी ते इ. १२ वी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा विषय ‘स्वयंभू’ भारत असा होता. सुरुवातीला नटराज पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या मा. सुरभी भावे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रशालेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरूवात गणेश वंदनेने झाली. देशातील चालू घडामोडींची माहिती व्हावी व आपला देश स्वयंभू बनवण्याकडे वाटचाल करत आहे याची जाणीव व्हावी म्हणून उरी हल्ला, काश्मीरचे 370 कलम, खेळातून देशभक्ती, देशभक्तीपर गीतांवर नृत्य – देखावे यातून मांडण्यात आले. चांद्रयान-2 चे प्रक्षेपण नाटकाच्या स्वरूपात सादर केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापक आद्य – क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनप्रसंगावर आधारित नाटिका सादर केली. इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी मातृभूमीच्या मानवाकडून असलेल्या अपेक्षा पत्र रूपात मांडणी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. मृणाल कदम व कु. श्रुती डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात पारितोषिक वितरण झाले त्याचे सूत्रसंचालन श्री. महेश कोतकर यांनी केले. इ.९ वी ते इ. १२ वी वर्गश: उत्कृष्ट विद्यार्थिनी व देणगीदारांची पारितोषिके प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. डॉ. म. वि. गोखले फिरता चषक इ.१० वी ची उत्कृष्ट कु. अनुष्काराजे निंबाळकर आणि डॉ. कॅप्टन सि. म. चितळे फिरता चषक इ.१२ वी ची उत्कृष्ट विद्यार्थिनी कु. संस्कृती जाधव यांना डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कार्यालयीन लिपिक श्री.मारणे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले तसेच सूत्रसंचालन कार्यवाह सौ. सावित्री पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत उपप्राचार्य श्री अनंत कुलकर्णी आणि उपस्थितांचे आभार श्री. अद्वैत जगधने यांनी मानले.

       दोन्ही प्रमुख पाहुण्या माजी विद्यार्थिनी मा. भाग्यश्री न्हालवे व मा. सुरभी भावे यांनी मार्गदर्शन पर मनोगतात प्रशालेतील अनुभव कथन केले. या शाळेने “स्वाभिमान, निर्भीडपणे जगाला तोंड दयायची वृत्ती, पेशन्स, सामाजिक भान, चूक सुद्धा स्वीकारण्याची वृत्ती, मानसिक आत्मबळ अशी आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल इतकी शिदोरी दिली आहे. उत्तम शिक्षक, शिक्षण, प्रेम, आपुलकी, घरासारखी हक्काची जागा या मोठया जगात दिली.” तसेच सैनिकी शाळेत मिळणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणाचा वक्तशीरपणा, संयम, शिस्त यांचा आपल्या पुढील आयुष्यात खूप फायदा होतो. त्यामुळे येथील प्रत्येक मुलीने, प्रत्येक गोष्ट मनापासून करावी शिक्षक – प्रशिक्षक यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन मुलींना केले.
    याप्रसंगी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा, डॉ. मानसी भाटे यांनी विद्यार्थीनीनचे मार्गदर्शनपर भाषणात कौतुक केले.
     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, स्नेहसंमेलन समिती ( सौ. सावित्री पाटील, श्री. कोतकर, श्री. जगधने, सौ. मारणे, श्री. जगदाळे,
सौ. वैशाली शिंदे, सौ. सोळंके, सौ. सुषमा पाटील ), पारितोषिक वितरण समिती (श्री. कोतकर, सौ. मारणे, श्री. जगदाळे, सौ. आंग्रे ) यांनी विशेष योगदान दिले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर ,माऊली, मेस विभाग, अश्वशाळा ते पाकशाळा सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

 

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इयत्ता ८ वी या वर्गातील विद्यार्थिनींवर रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी विद्याव्रत संस्कार करण्यात आला. त्यापूर्वी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध व्याख्यानांची रचना करण्यात आली होती. प्रत्येक व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्री.भाऊसाहेब मार्तंड यांनी विद्यार्थिनींकडून गीत म्हणून घेतले. सदर व्याख्याने आपल्याच प्रशालेतील विविध शिक्षकांकडून देण्यात आली. ती पुढीलप्रमाणे,

प्रारंभिक व्याख्यान – प्राचार्या मा.डॉ.सुलभा विधाते
बौद्धिक विकसन – पर्यवेक्षक व इतिहास विभाग प्रमुख श्री.श्याम नांगरे
आत्मिक विकसन – भूगोल विभाग प्रमुख श्री.अद्वैत जगधने
शारीरिक विकसन – पर्यवेक्षक व क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार
मानसिक विकसन – विज्ञान विभाग प्रमुख सौ.मंजिरी पाटील
राष्ट्र अर्चना – भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने

प्रत्यक्ष विद्याव्रत संस्कार रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी इयत्ता ८ वी चे पालक, विद्यार्थिनी, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शुभांगी भालेराव, प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे आणि श्री. संदीप पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता ८ वी – अ चे वर्गशिक्षक श्री. गजानन पाटील यांनी केले. सौ. स्नेहा मुदगल व संस्कृत विभाग प्रमुख श्री. साईनाथ जगदाळे यांनी पोथीवाचन केले. पालकांमधून सौ. विद्या भडाळे व श्री. सुभाष वाघ यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींमधून कु. अहिल्या मोरेपाटील व कु. तनिष्का भोगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रमुख अतिथींनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्री. गजानन पाटील यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात उपस्थितांना पेढेवाटप करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी ट्रेक संदर्भात पालकांना सूचना दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सौ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता ८ वी चे वर्गशिक्षक श्री. गजानन पाटील आणि श्रीमती अश्विनी गाभणे यांनी केले.

 

 

 

 

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, मुळशी येथे भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला ,सकाळी प्रमुख अतिथी एअर कमोडोर घार सिंग (प्रिंसिपल डायरेक्टर ट्रेनिंग, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले ,या नंतर 5 वी ते 12 वी चे शानदार संचलन झाले ,याच कार्यक्रमात शाळेची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी स्कूल कॅप्टन श्वेता पाटील हिचा मानाची तलवार देऊन सन्मान करण्यात आला यानंतर इयत्ता बारावीची पासिंग आऊट परेड झाली यात शाळेत इ.पाचवी ते बारावी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले ,यानंतर विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यात डंबेल्स ,मास पी .टी, पिरॅमिड्स ,लेझीम ,आर्चरी ,हॉर्स रायडिंग ,रोप मल्लखांब, व्हर्टीकल रोप क्लायबिंग व कराटे या यांचा समावेश होता आर्चरी ,रायफल शूटिंग ,हॉर्स रायडिंग व कराटे यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्व मान्यवर अतिथी ,पालक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले .याप्रसंगी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा व आंतरकुल क्रीडा स्पर्धेत विजयी दुर्गावती संघाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,अतिथी मनोगतात एअर कमोडोर श्री.घार सिंग यांनी सांगितले की या शाळेतील मुली नक्कीच देशाच्या सरंक्षण दलात सक्षम अधिकारी म्हणून काम करतील असा विश्वास वाटतो, या कार्यक्रमाला सिनेमा दिग्दर्शक पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री.राम गोपाल बजाज, अभिनेते श्री.रिजूजी बजाज, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. लीना कळमकर , शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष सौ.स्वाती काटे ,शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते ,शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन (निवृत्त) श्री विजय कुलकर्णी ,उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी ,पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री संदीप पवार , सर्व पालक ,कासार आंबोली ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुलभा विधाते यांनी केले तर आभार कमांडंट ग्रुप कॅप्टन (निवृत्त) श्री विजय कुलकर्णी यांनी मानले , अतिथी परिचय सौ.सावित्री पाटील यांनी करुन दिला सूत्रसंचालन श्री.महेश कोतकर , व विद्यार्थिनींनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सैन्य प्रशिक्षक आॅनररी कॅप्टन श्री. चंद्रकांत बनसोडे, शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी कामकाज पाहिले ,कार्यक्रमाचे नियोजन सर्व क्रीडा प्रशिक्षक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

माजी विद्यार्थी मेळावा दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२० रोजी सैनिकी शाळेमध्ये उत्साहात पार पडला.सैनिकी शाळा ही एक सक्षम स्त्री घडविणारी आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळाआहे.येत्या काही वर्षात शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे . याचे औचित्य साधून माजी विद्यार्थी यांचा मेळावा शाळेमध्ये आयोजित करण्याचे ठरवले. इतर शाळांत प्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या परिसरातच न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहतात या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या विकासात हातभार लावतील असा प्रयत्न केला गेला.निवासी मेळाव्याचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. मेळाव्यास एकूण 25 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. रायफल शूटिंग ,आर्चरी, खेळ ,शेकोटी ,अनुभव कथन, गप्पागोष्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मुलींसाठी केले गेले. भविष्यात शाळेमध्ये आपण काय योगदान करू या विषयी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निवासी मेळाव्याचे नियोजन शाळेतील शिक्षक श्री. अद्वैत जगधने सर व सौ. अश्विनी मारणे मॅडम यांनी केले त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली. मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन शाळेच्या प्राचार्य डॉक्टर सुलभा विधाते यांनी केले त्याचबरोबर याप्रसंगी शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी हे देखील आवर्जून उपस्थित होते.

दि. २३ व २४ डिसेंबर रोजी आपल्या प्रशालेचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक संपन्न होत आहे. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवित आहोत सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे.

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक व “आपलं घर ” संस्थेचे संस्थापक मा. श्री.विजय फळणीकर यांचा म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधना फळणीकर यांचा ही सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्रीमती अरुणा देशमुख, श्रीमती प्रतिभा भट, श्री.नितीन विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री.संदीप पवार हे उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री. विजय फळणीकर यांनी सांगितले की घरची परिस्थिती खूपच प्रतिकुल असल्याने संघर्ष करावा लागला व या संघर्षातून च आपल्याला माणुस म्हणून जगण्याची प्रेरणा मिळाली व त्यामुळे च आपलं घर च्या माध्यमातून समाजाच्या सुख – दुखाशी एकरुप होता आले प्रास्ताविकात मा.प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी असे सांगितले की मा. श्री. विजय फळणीकरांचे कार्य म्हणजे एखाद्या दीपस्तंभासारखेच आदर्शवत आहे. या प्रसंगी लेखक मा. श्री. विजय फळणीकर यांनी शाळेला सामाजिक जाणीवा जागृत करणारी अशी प्रेरणादायी स्वयंलिखित पुस्तके शाळेला भेट दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती दिपाली आंबेकर यांनी केले, आभार श्री. अनंत कुलकर्णी यांनी मानले, या कार्यक्रमाचे आयोजन ‘गोडबोले ट्रस्टच्या’ अंतर्गत समन्वयक श्री. अद्वैत जगधने व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले.

ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी कमांडंट कर्नल श्री. सारंग काशीकर आणि प्राचार्या सौ.पूजा जोग उपस्थित होते. ऍडमिरल विष्णू भागवत पीव्हीएसएम, एव्हीएसएम या पदकांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे नौसेना प्रमुख म्हणून व एक प्रतिभावान आणि ऑल-राउंड ऑफिसर म्हणून भारतीय नौदलातील एक उत्कृष्ट कारकीर्द त्यांनी गाजवली.

प्रशालेतील इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थिनींशी ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी सुसंवाद साधला. निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप
असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती तसेच १८५७ च्या उठावातील राणीने केलेल्या नेतृत्वाविषयी सांगितले. प्लासीची लढाई व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे विस्तारवादी धोरण या इतिहासाविषयी माहिती दिली.

ऍडमिरल विष्णू भागवत सांगतात की, “जेव्हा सर्व शेतक-यांचे अश्रु पुसले जातील तेव्हा भारत सार्वभौम होईल.” त्यानंतर जय हिंद असे म्हणत विद्यार्थिनींना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री. महेश कोतकर यांनी केले.

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली मुळशी येथे ७३ वा स्वातंत्र दिन समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी विंग कमांडर अनुपमा मोंगा यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर भर पावसात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यर्थिनींनी शानदार संचलनाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, सौ.माधवी देशपांडे, सौ. संध्या टाकसाळे, प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, शिक्षकवृंद आणि सैनिकी परिवारातील सर्व सदस्य व पालक उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या मनोगतात विंग कमांडर अनुपमा मोंगा यांनी सांगितले की आज सर्वच क्षेत्रात महिला सक्षमपणे दमदार पाऊल पुढे टाकत आहेत तसेच आज या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या कॅडेट्सनी भर पावसात केलेले शानदार संचलन पाहून देश सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री आहे तसेच या शाळेतील अधिकाधिक मुली सैन्यदलात अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ.माधवी मेहंदळे यांनी सांगितले की अश्या शारीरिक व मानसिक क्षमता असण्याऱ्या कणखर मुली घडविण्याचे काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा करीत आहे याचा सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले की १६० वर्षांची परंपरा असलेल्या म. ए. सो या संस्थेच्या या सैनिकी शाळेत सैनिकी प्रशिक्षणाबरोबरच राष्ट्रप्रेमाचे संस्कार ही केले जात असून सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी आज सैन्यदलाबरोबरच इतर ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री. संदीप पवार, ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे, सुभेदार आर. तिवारी, श्री. गजानन माळी व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या सयुंक्त विद्यमाने सोमवार दिनांक १३ ऑगस्ट विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन रावसाहेब पटवर्धन विद्यालय, सिंहगड रोड, पुणे यांच्या तर्फे करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये म. ए. सो. राणी लक्ष्मिबाई मुलींची सैनिकी शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. ‘स्वस्थ व स्वच्छ भारत’ संकल्पनेवर आधारित ‘कीर्तन आरोग्याचे’ ही नाटिका सादर करण्यात आली. या नाटीकेची निवड विभागस्तरावर करण्यात आली.

नाटिकेचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेतील अध्यापक श्री. राजेश शिंदे यांनी केले असून, नेपथ्य व मार्गदर्शन विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांनी केले. पेटी वादनासाठी श्री. साईनाथ जगदाळे तर तांत्रिक बाबतीत श्री. रविराज थोरात यांनी साहाय्य केले. विज्ञान अध्यापिका सौ.स्नेहा मुद्गल व सौ. वैशाली शिंदे यांनी मार्गदर्शन व सहाय्य केले. या यशाबद्दल सैनिकी शाळेचे कमांडंट कर्नल श्री. सारंग काशीकर, प्राचार्या सौ. पूजा जोग, शाळेचे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

दरवर्षीप्रमाणे प्रशालेतील वर्ग प्रतिनिधींची निवड ही शिस्त, आज्ञापालन, सामुहिक जबाबदारीचे तत्व ह्या निवडणुकीच्या महत्वाच्या अंगांनुसार पार पडली. निवडणूक यंत्रणा हे शासन संस्थेचे प्रमुख अंग आहे. प्रशालेतील निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने उमेदवार, मतदार, मतपेटी, गुप्त मतदान पध्दती, मतपत्रिका, मतदान अधिकारी, निवडणूक निकाल या पध्दतीने पार पडली. इयत्ता ५वी ते १२वी प्रत्येक वर्गानुसार शिस्त मंत्री, अभ्यास मंत्री, स्वच्छता मंत्री या तीन पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेतून विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मदत होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारी व कर्तव्य प्रशालेचे कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी स्पष्ट करुन सांगितली.

राज्य विज्ञान संस्था, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्रांती ४.० (Industrial Revolution 4.0) या विषयावर आधारित सादरीकरण केले. यासाठी स्वतः तयार केलेली भित्तीपत्रके (Posters) व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात आला.

सदर स्पर्धेसाठी आपल्या प्रशालेतील इयत्ता १०वी तील विद्यार्थिनी कु. नेहा पाटील या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक
मिळविला व तिची निवड राज्य स्तरासाठी करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारीच्या परंपरेची माहिती विद्यार्थिनींना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी प्रशालेत आषाढी
एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले गेले. यामध्ये इयत्ता ५ वी तील साया साळवे-विठ्ठल, संस्कृती गिरासे-रखुमाई आणि सर्व विद्यार्थिनी वारकरी म्हणून सहभागी झाल्या.

वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना याचे
गायन वृंदा गांजुरे, समृद्धी साखरे या विद्यार्थिनींनी केले तसेच वैभवी इंगवले, केतकी घोडके, तेजस्वीनी बांदल, रिया देशपांडे या विद्यार्थिनींनी
विठ्ठलाचे गुणगान करणारी गीते सादर केली. या कार्यक्रमास इयत्ता ५ वी वर्गशिक्षक श्रीमती सविता हिले, श्रीमती प्रमिला महाले यांनी मार्गदर्शन
केले. तसेच कमांडंट श्री. सारंग काशीकर आणि मुख्याध्यापिका पूजा जोग यांचे सहकार्य लाभले. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या
विठूमाऊलीच्या आनंद सोहळ्यात तल्लीन होण्याचा अनुभव सैनिकी परिवाराने घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती आणि विठ्ठलाच्या
आरतीने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा,
कासार आंबोली, ता. मुळशी, जि. पुणे
संस्कृत दिन आणि महाकवी कालिदास जयंतीनिमित्त
संस्कृत काव्यवाचन स्पर्धा
संस्कृतं ये प्रशंसन्ति ये प्रशंसन्ति संस्कृतिम्
स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नरा:।।
-संस्कृत विभाग (विभाग प्रमुख – साईनाथ जगदाळे)

शुक्रवार दि.१३ जुलै २०१८ रोजी महाकवी कालिदास जयंती व संस्कृत दिननिमित्त संस्कृतकाव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, नंतरमान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागातील संस्कृत अध्यापक साईनाथजगदाळे यांनी सरस्वतीवंदना सादर केली व उपस्थितांचेस्वागत केले. त्यानंतर प्रशालेतील इ.१० वीच्या विद्यार्थिनींनीमहाकवी कालीदास गीत सादर केले.

या कार्यक्रमाला प्रशालेतील मा. प्राचार्या मा. जोग मँडम, कमांडट सारंग काशिकर सर, उपप्राचार्य कुलकर्णी सर, पर्यवेक्षक नांगरे सर व पवारसर तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागाचे प्रमुख यांनी केले. त्यामध्ये महाकवी कालीदास जयंती व दीप अमावस्या याविषयी थोडक्यात माहिती सांगितली गेली. ती माहिती सांगत असताना त्यामध्ये विविध श्लोकांचे दाखले सरांनी दिले. ते पुढीलप्रमाणे –

कालिदास जयंती
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रिडापरिणत गजप्रेक्षणीयं ददर्श ।। मेघदूत।।

पुरा कवीनां गणनाप्रसंगे
कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा:।
अद्याSपि तत्ततुल्यकवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव।।
दीप अमावस्या
दीपज्योति: परब्रम्ह दीपज्योतिर्जनार्दन:
दीपो हरति पापानि दीपज्योतिर्नमोSस्तुते।।

या श्लोकांतुन आजच्या दिनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. या नंतर अध्यक्षांची परवानगी घेऊनप्रमुख कार्यक्रम संस्कृतकाव्यवाचन स्पर्धा सुरु करण्यात आली. काव्यवाचन स्पर्धची संपूर्णमाहिती परिक्षा विभाग प्रमुख सौ. शिंदे मँडम यांनी सांगितली. इ. १२ वी ते इ. ५ वी अशा पध्दतीने स्पर्धा घेण्यात आली. काव्यवाचन स्पर्धेच्या परिक्षक – मा. प्रणाली गोगटे मँडम काव्यवाचन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सम्मान सोहळा झाला. नंतर पाहुण्यांचे मार्गदर्शनपर मनोगत झाले. त्यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व व व्याकरणाचा वापर कसा करावा. याद्दल सविस्तरमाहिती दिली. नंतर अध्यक्षिय भाषण मा. प्राचार्या जोग मँडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त संस्कृतच्या वाङ्मयांचा अभ्यास करावा, असे आवाहन केले. आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन महाले मँडम यांनी केले. नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम पत्रिका

दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजन (प्रमुख पाहुणे, मा. प्राचार्या, उपप्राचार्य, पर्यवेक्षक)
समुह गीत (प्रशालेच्या विद्यार्थिनी)
प्रास्ताविक (साईनाथ जगदाळे सर)
विद्यार्थिनी मनोगत (इ.१२वी-वेदश्री तेंडुलकर)
संस्कृत काव्यवाचन स्पर्धा (इ.५वी ते १२वी)
परिक्षक परिचय
परिक्षक मनोगत
अध्यक्षिय भाषण
आभार (मा. महाले मँडम)
समारोप (सामुहिक पसायदान)

दरवर्षीप्रमाणे दिनाक ७ जुलै शनिवार रोजी प्रशालेत वर्धापनदिन साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्ताने

इयत्ता १० वी व १२ वी तील प्रथम पाच विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. श्री. हेमचंद्र इनामदार तसेच प्रशालेच्या हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच डॉ. मानसी भाटे, महामात्रा शाला समिती या देखील उपस्थित होत्या. पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता १० वी गुणवंत विद्यार्थिनीं :
१) कु. श्वेता पाटील – ९४.८० %
२) कु. मानसी भामरे – ९४.२० %
३) कु. वृंदा मेस्त्री – ९३.८०%
४) कु. सृष्टी साळुंखे – ९३.४०%
५) कु. अनुष्का पगार – ९३ %

इयत्ता १२ वी गुणवंत विद्यार्थिनीं :
१) कु. दिक्षा खेडकर – ७२.४६ %
२) कु. प्राजक्ता डुकरे – ७०.६२ %
३) कु. नेहा लोंढे – ६८.४६ %
४) कु. स्नेहल ठाकरे – ६६.९२ %
५) कु समृद्धी खोत .– ६६.४६ %

बुधवार दि. २७ जून २०१८ रोजी दु. ४.०० वा. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पर्सिस्टंट फौन्डेशनच्या श्रीमती सोनाली देशपांडे, श्रीमती अनया नेतानराव व शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरणाचे प्रशालेचे हे ९ वे वर्ष आहे. सैन्यप्रशिक्षणाबरोबर हरित प्रकल्प हा प्रशालेचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. सदर उपक्रमामध्ये प्रशालेतील घन कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, भाजीपाला लागवड व एक मुल एक झाड इ. विविध गोष्टी मुली करतात. शाळा निवासी असल्याने कचऱ्याची समस्या प्रशालेताही आहे. यामध्ये वसतीगृह, भोजनालय व प्रशाला या तीनही ठिकाणी कचरा निर्माण होतो. कचरा प्रशालेच्या बाहेर न जाऊ देता विद्यार्थिनी प्रशाला परिसरातच गांडूळ खत व कॉम्पोस्टिंग च्या माध्यमातून परिसरातच जिरवतात. प्लास्टिक तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून त्या त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट केली जाते.

या व्यतिरिक्त मुलींमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती होण्यासाठी विविध उपक्रम,कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन असे वर्षभर नियोजन केले जाते. यातूनच मुलींवर हरित संस्कार केला जातो. हरित शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त होण्यासाठी विद्यार्थिनीचा वर्षभर या उपक्रमांमध्ये सक्रिया सहभाग व त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थिनींची लेखी परीक्षा, तज्ञांमार्फत मुलाखती घेतल्या जातात. सर्वोत्तम काम करणाऱ्या विद्यार्थिनीनाच हरित शिष्यवृती व पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे हरित शिष्यवृत्ती ५ विद्यार्थिनींना देण्यात आली.

क्रमांकविद्यार्थिनींचे नाववर्गरक्कम
सृष्टी प्रमोद कारखानीस६ अ२५०००
वैभवी दिलीप  जाधव११ ब२००००
सृष्टी बालाजी रायबन७ ब१५०००
सृष्टी परमेश्वर बोऱ्हाडे६ अ१००००
पायल धनंजय जासूद७ ब५०००

त्याचप्रमाणे
हरित पुरस्कार रु. २००० प्रत्येकी, पुढील ९ विद्यार्थीनीना प्रदान करण्यात आली.

क्रमांकविद्यार्थिनींचे नाववर्गरक्कम
पायल मांडेकर७ ब२०००
सई मिलिंद खानविलकर७ ब२०००
वैष्णवी कवडे११ ब२०००
साक्षी सुखदेव शिरसकर१० अ२०००
जागृती जयसिंग खुंटे१० ब२०००
ऐश्वर्या अनिल राऊत५ ब२०००
वेदश्री वसंत बाबर५ अ२०००
राधिका पोपटराव चांदगुडे८ अ२०००
पलक किरण मिठारी८ ब२०००

सर्व शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचे मान्यवर व  सैनिकी परिवाराने कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख श्री. श्याम नांगरे व पर्यावरण विभाग सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती या निमित्ताने कुलश: वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे नियोजन इतिहास विभागातर्फे करण्यात आले. खालीलप्रमाणे भाषा व विषयानुसार गट विभागणी करण्यात आली,
गट क्र.१) ५वी व ६वी मराठी
गट क्र.२) ७वी व ८वी मराठी
१.बालपणीचे टिळक २. टिळक व गणेशोत्सव / शिवजयंती ३. टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान ४.असंतोषाचे जनक टिळक

गट क्र.३) ९वी ते १०वी हिंदी
१. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे २. तिलक और उनका लेखन ३. तिलक और भारतीय स्वतंत्रता संग्राम मे उनका योगदान

गट क्र.४) ११वी, १२वी English
1. Lokshahir Annabhau Sathe 2. Tilak and Wangbhang Movement 3. Tilak and ‘Geeta Rahasya’ in Mandalay

याबाबत विषय निवड, व्यासंग, विषय मांडणी, सादरीकरण, हावभाव, उच्चार, वेळ व अभिप्राय या मुद्द्यांनुसार मूल्यांकन करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या सर्व विद्यार्थिनींना मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आली. या स्पर्धेत पहिला क्रमांक लक्ष्मी कुलाने पटकाविला.

Scroll to Top
Skip to content